सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे १०८९ सभासद शेतकरी,वाहतूक ठेकेदार झाले कर्जमुक्त

सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील

आम्ही संचालक मंडळ फक्त कारखाना आणि सभासद,कामगार यांचं हिताचं पाहतो – आमदार अभिजीत पाटील

व्यवहार टिकला तरच कारखाना टिकेल आणि कारखाना टिकला तरच पार्टी टिकेल – आमदार अभिजीत पाटील

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालिन संचालक मंडळाने सन २०१६-१७ मध्ये कारखान्याचे सभासद शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदारांचे नावावर कर्ज काढून ते थकीत ठेवले होते.सदरचे कर्ज थकीत राहिल्याने बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया शाखा पंढरपूर यांनी वसुलीची कारवाई करून संबंधित शेतकरी तोडणी, वाहतूक ठेकेदार व कामगार यांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते.संबंधितास वसुलीच्या नोटिसा सोबत ७/१२ वर बोजे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे त्यांच्या नावावर कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळांनी कर्जे केलेली होती त्यांच्या विरोधात शेतकरी ठेकेदार व कामगार यांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. सदर कर्जाचे प्रकरण निकाली नाही निघाली तर संबंधितांवर वसुलीची व पुढील कारवाई होणार होती. या त्रासाला कंटाळून काही शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार आत्महत्या शिवाय पर्याय राहिला नव्हता.

परंतु कारखान्याच्या विद्यमान चेअरमन व आमदार अभिजीत धनंजय पाटील हे याबाबत संबंधित बँक ऑफ इंडियाची प्रकरणे कोर्टात असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावून न्यायालय व बँक यांच्याशी समन्वयाने चर्चा करून तडजोडीने दोन्ही बँकांची कर्ज प्रकरणे ओटीएस द्वारे निकाली काढून शेतकरी सभासद ठेकेदार यांना पीक कर्ज व इतर कोणतेही कर्ज प्रकरणे करण्यासाठी भविष्यात बाधा येणार नाही अशी तडजोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे तब्बल १०८९ लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.संचालक मंडळांनी दि.१३ सप्टेंबर२०२५ रोजी संबंधित शेतकरी सभासद,कामगार व ठेकेदार यांना कारखानास्थळी बोलवून सदर कर्जाचे बेबाकी दाखले वाटप करण्यात आले. दाखले स्वीकारताना संबंधित शेतकरी सभासद ठेकेदार यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

सदरप्रसंगी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले की,विठ्ठल कारखान्याचा चेअरमन म्हणून पदभार स्वीकारल्यापासून कारखान्याचे सभासद शेतकरी,कामगार यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेच्या हिताचे निर्णय घेत आहोत.संचालक मंडळाने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दिलेला शब्द पूर्ण करत असताना आज मला मनस्वी आनंद होत आहे.अडकलेली कर्ज प्रकरणे तडजोडीने निकाली काढत असताना पुन्हा त्याच किंवा इतर बँक सदर खातेधारकांना कर्ज देतील याची सोय केलेली आहे.कर्ज परतफेड पेक्षा शेतकरी सभासद आणि कामगार यांच्या विरोधातील वसुलीचा बडगा थांबवणे व त्यांना चिंतामुक्त करणे हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते.या ओटीएसमुळे कोणत्याही शेतकऱ्यास बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असेल तर त्यांची अडचण दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. कारखान्याचे संस्थापक चेअरमन औदुंबर आण्णा पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रुपी लावलेल्या रोपट्यास कै.वसंत दादा काळे, आमदार कै.भारतनाना यांनी वाढवलेले ते सांभाळण्याची जबाबदारी आम्हा संचालक मंडळावर आली असून ती आपल्या सर्वांच्या साथीने पार पाडत आहे, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे माजी संचालक तथा तत्कालीन ऊस तोडणी वाहतूक कमिटीचे अध्यक्ष दशरथ खळगे, माजी संचालक रामदास चव्हाण,नांदुरे गावचे सरपंच मारुती भिंगारे यांनी आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार करून थकलेल्या कर्जची परतफेड करून कर्ज निरंक करून बेबाकी दाखले वाटप करीत असल्याबाबत आभार मानून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

याप्रसंगी संचालक तुकाराम मस्के यांनी प्रस्ताविक केले.प्रा.महादेव तळेकर, संचालक जनक भोसले, संचालक सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत आमदार अभिजीत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून शेतकरी सभासद, तोडणी ठेकेदार व कामगार यांच्या भोवती आवळलेल्या वसुलीरुपी फासातून मुक्तता केल्याबद्दल आभार मानले.

जे लोक संचालक मंडळांच्या कामकाजावर टीका करतात त्यांनी कारखान्यावर येऊन प्रत्यक्ष कारखान्यातील आधुनिकीकरणाची प्रगती पाहावी मगच बोलावे स्वेरीचे असे सांगत स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बी.पी. रोंगे सर यांनी १०८९ कुटुंबाला कर्जमुक्त करून पूर्वपदावर आणल्याबद्दल आमदार अभिजीत पाटील यांचे अभिनंदन केले.

आज जे सभासद शेतकरी दाखले घेण्यासाठी कारखाना स्थळावर येऊ शकले नाहीत त्यांनी त्यांच्या वेळेनुसार कारखान्यावर येऊन दाखले घेऊन जावेत असे आवाहन कार्यकारी संचालक डी.आर गायकवाड यांनी केले आहे.या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधी अधिकारी ओंकार अवधूत यांनी केले.

Leave a Reply

Back To Top