आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ आवताडे
आ समाधान आवताडे यांच्या मागणीनुसार वारी अनुदान पाच कोटी वरून दहा कोटी होणार
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- वर्षभरामध्ये विविध वारी सोहळ्याच्या निमित्ताने व इतर कालावधीत श्री.विठ्ठल-रखुमाई दर्शनसाठी हजारो भाविक पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत असतात. भगवंत पांडुरंगाच्या वारी सोहळ्यामध्ये सर्वात मोठा आणि अभूतपूर्व सोहळा म्हणजे आषाढी एकादशी वारी होय. या वर्षीचा हा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या वारीनिमित्त पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी सर्व भौतिक सोयी-सुविधा बाबींची नीटनेटकेपणाने व व्यवस्थित पूर्तता होणार असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपाने साजरा करण्याच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे या सोहळ्यानिमित्त केलेल्या नियोजनाची आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीनंतर आमदार आवताडे हे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, वारी परंपरेतील अतिशय महत्त्वपूर्ण आणि अविभाज्य घटक म्हणजे संपूर्ण देशातून पंढरपूर शहरांमध्ये दाखल होणाऱ्या विविध दिंड्या उत्सव आहे. आषाढी एकादशी निमित्त जवळपास १५०० हून अधिक दिंड्या पंढरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. या दिंड्या समवेत आलेल्या वारकरी भाविकांना व इतर वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनामार्फत विविध बाबींची पूर्तता करण्याचे काम आघाडीवर आहे. त्याचबरोबर यात्रा अनुदान अनुषंगाने वारी सोहळ्यासाठी अनुदान वाढवून मिळण्यासाठी आ आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी केली असता त्यास शासन पातळीवर निर्णय होऊन पूर्वी ५ कोटी असणारे अनुदान आता १० कोटी एवढे झाले आहे. तसेच सर्व दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचेही मंत्री महोदय यांनी जाहीर केले आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना दौंड येथे करण्याचे नियोजित असताना पालखी विश्वस्तांनी याला कडून विरोध केला असता मुख्यमंत्री ना.शिंदे व उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी या कत्तलखाना रद्द करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
तत्पूर्वी सकाळी पुणे येथे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अनुषंगाने विभागीय आयुक्त पुणे येथे आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीसाठी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित राहून पर्यटन विकास संदर्भात मतदारसंघातील विविध मागण्या मंत्री महोदय यांच्यासमोर मांडल्या.
भारताची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या पंढरपूर येथील श्री.विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनासाठी वारीच्या रूपाने अनेक वारकरी भक्त पंढरपूर नगरीमध्ये ये- जा करत असताना या भाविकांना पंढरपूर येथील बस स्थानक जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे पंढरपूर बसस्थानकाचे विस्तारीकरण करून करून द्यावे.पवित्र चंद्रभागा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी स्वच्छतेच्या दिशेने योग्य ती कार्यवाही करून चंद्रभागा नदीचे पवित्र जतन करण्यात यावे.चंद्रभागा नदीमध्ये भक्तीस्नान करणाऱ्या महिला वारकरी भगिनींना चंद्रभागा आवारामध्ये स्नानगृहे उभारण्यात यावीत व पालखी मार्गावर वृक्षारोपण करणे अशा विविध मागण्या आमदार आवताडे यांनी या बैठकीवेळी केल्या.
या बैठकीसाठी आमदार संजय शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शासकीय विभागांचे सचिव,अप्पर सचिव,पोलीस प्रशासनातील अधिकारी, इतर मान्यवर , विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.