वारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची कार्यक्रमाला उपस्थिती

पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०६/२०२४- आज महायुती सरकारचा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला.त्यात त्यांनी वारकऱ्यांसाठी काही ठळक घोषणा केल्या आहेत.यात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्याच्या घोषणेचा समावेश आहे तसेच निर्मल वारी साठी निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार करण्याची घोषणा करण्यात आली.

यानिमित्ताने वारकऱ्यांच्या वतीने विधिमंडळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना विठ्ठलाची मूर्ती देऊन वारकऱ्यांनी आभार मानले.

राज्यात स्वच्छ आणि निर्मल वारी झाली पाहिजे यासाठी सर्व खबरदारी सरकारकडून घेण्यात येणार असून वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आणि मोबाईल टॉयलेट राज्य शासनाकडून देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेने द्वारा आयोजित विधान भवन परिसरात वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी वारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह वारकरी अक्षय महाराज भोसले (प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना), शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे,दिनेश शिंदे,योगेश केदार यांच्यासह वारकरी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.