भाविकांना दर्शन रांगेत शुध्द पिण्याचे पाणी, लिंबू सरबत,खिचडीचे वाटप – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.18- चैत्री शुध्द एकादशी 19 एप्रिल रोजी संपन्न होत असून, या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी पत्राशेड व दर्शनरांगेत आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
दर्शन रांगेतील भाविकांना दशमी व द्वादशी दिवशी तांदळाची खिचडी,एकादशी दिवशी साबुदाण्याची खिचडी त्याचबरोबर लिंबू सरबत अथवा मठ्ठा मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
याचा शुभारंभ गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात आला.यावेळी मंदिर समिती सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, हभप श्री ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी, बलभीम पावले व भीमाशंकर सारवाडकर उपस्थित होते.
यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना थंड व शुद्ध पिण्याचे पाण्याचे वाटप करण्यात येत आहे.आरोग्य सुविधा, लाईव्ह दर्शन व्यवस्था आदींची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मंदीर समितीमार्फत यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना दिल्या जाणाऱ्या सोई सुविधां आवश्यकते नुसार वाढवण्यात येत असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.