नगरपरिषदेच्या वतीने शहरातील कचरा उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू व सोबतच धूर फवारणी व जंतुनाशक फवारणी चालू
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२– पंढरपूर शहरामध्ये आज दि.१२ जुलै २०२४ रोजी एकादशी सोहळा संपन्न होत आहे .कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल- रुक्मिणी च्या दर्शनासाठी देश विदेशातून व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.या यात्रा कालावधीत सुमारे ४ ते ५ लाख वारकरी-भाविक दर्शनासाठी आले आहेत. या येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी अश्या सूचना दिल्या आहेत त्या नुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली.

कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. यात्रे नंतर बहुतेक द्वादशी दिवशी शहरातील कचरा उचलण्याचे काम हाती घेण्यात येते परंतु यावर्षी भाविकांची संख्या कमी असल्याने वाहने प्रदक्षिणा मार्ग व इतर ठिकाणी जात असल्याने मठामध्ये व परिसरात साठलेला कचरा गोळा करण्याचे काम त्वरित हाती घेण्यात आले आहे.

एकादशीच्या रात्री पासुनच २४ तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम चालू केले आहे. येत्या दोन दिवसात शहरातील सर्व कचरा उचलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याकामी शहरासह ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर, शहर उपनगर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी ११०० स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत मात्र बऱ्याच ठिकाणी भाविकांनी उघड्यावर खरकटे अन्न व इतर घाण केल्याने दुर्गंधी पसरल्याचे तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त झाले आहेत तसेच यावर्षी सारखा पाऊस पडत असल्याने पावसाची पाणी साठल्याने डासाचे ही प्रमाण वाढले आहे त्यामुळे कचरा उचलण्याचे कामा बरोबरच नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जंतुनाशक पावडर फवारणी व ६ ब्लोअर मशीन ने बायो कल्चर फवारणी हाती घेतली आहे त्यामुळे झालेल्या घाणीचे डीकंपोस्टिंग होऊन दुर्गंधी नष्ट होणार आहे. तसेच मलेरिया विभागाकडून ५० कर्मचारी ५ हातपंप द्वारे डासअळी नाशक फवारणी व ४ फॉगींग मशीन द्वारे धूर फवारणी करण्यात येते आहे, तसेच शहरातील भाग व रुळाच्या वरील भाग व उपनगर असे दोन भाग करण्यात आलेले आहेत.जंतुनाशक फवारणीसह, अबेट, मँलेथॉन पावडर सर्वत्र टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ४१ घंटागाडी आरोग्य विभागाकडील ६ टिपर,३ कॉम्पॅक्टर, ६ डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने ११०० कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छता करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी केले असून मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी अँड .सुनील वाळुजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, आरोग्य निरीक्षक नानासाहेब गोरे, नागरी हिवताप प्रमुख शुभांगी अधटराव व सर्व विभाग प्रमुख यात्रा स्वच्छ व सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत.

Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.