पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पत्राशेड व दर्शन रांगेची पाहणी
पालकमंत्री गोरे यांनी वारकरी भाविकांशी साधला संवाद
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ :- आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे.आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.श्री.विठ्ठल रुक्मिणी च्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून दर्शन रांग गोपाळपूर पर्यंत गेली आहे.पद दर्शन रांगेत तसेच पत्राशेड येथे भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासनच्या वतीने आवश्यक मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून या उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.

पददर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये तसेच पद दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीकडून करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती घेतली.या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालये,हिरकणी कक्ष,पाणी पुरवठा,आरोग्य सुविधांची पाहणी केली.पद दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून मंदीर समितीकडून पत्राशेड,दर्शनरांगेत उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी पालकमंत्री गोरे यांनी दर्शन रांगेतील भाविकांना मोफत अन्नदान सुरु केले असुन या अन्नदानाचे वाटपही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.वारकरी भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची कमतरता भासणार याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.पाहणी करताना वारकरी व भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पालकमंत्री गोरे यांनी दुचाकीवरुन दर्शनरांगेची गोपाळपूर पर्यंत पाहणी केली.

मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदीर प्रशासनाकडून पत्राशेड, दर्शन रांग, दर्शन मंडप,मंदीरात भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबतची माहिती दिली.दर्शनरांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी त्यांच्या समवेत पाहणी करताना कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले,मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री, सांगोला चे तहसिलदार संतोष कणसे आदी उपस्थित होते.